नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा  लाभ देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात अधिकाधिक बँकेच्या शाखा उघडाव्यात अशा सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिल्यात.

            आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आकांक्षित जिल्हा आढावा बैठक तसेच बँक कमिटीच्या  बैठकीत  डॉ.कराड बोलत होते.  या बैठकीस पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, मीनल करनवाल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच बँकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            डॉ.कराड म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहे. या अर्थव्यवस्थेत सामान्य नागरिकांचा वाटा असण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्र विस्तारणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रत्येकी एक लक्ष लोकसंख्येमागे किमान 14 शाखा आणि 11 एटीएम असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात बँकाच्या शाखा आणि एटीएमचा विस्तार करण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा. नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून या जिल्ह्याला विकसित करण्यासाठी शहरी तसेच दुर्गम भागात जास्तीत जास्त बँकेच्या शाखा उघडाव्यात. बँक अधिकाऱ्यांनी  शाखा उघडण्यासाठी सर्व्हे करावा. गावात सर्व्हे करून प्रत्येक बँकेने नवीन शाखांची निर्मिती करावी. ‘शाखा तेथे एटीएम’ हे धोरण बँकानी राबवावे.

 जिल्ह्यात क्रेडिट डिपॉझिटचे प्रमाण वाढविण्यावर विशेष भर द्यावा. तसेच ग्राहकांना सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे. कर्जाची कोणतीही प्रकरणे प्रलंबित ठेवू नये. कागदांच्या पुर्ततेविषयी संबंधितांना त्वरित समजावून सांगावे. शेतकरी, गोरगरीब, युवक आदींसाठी केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना झाला पाहिजे. गरीब लोकांचे जीवनमान उंचावले तरच अर्थव्यवस्था उंचावेल, असेही ते म्हणाले.

            मुद्रा कर्ज योजना, जनधन योजना, किसान क्रेडिट कार्ड,अटल पेन्शन योजना, बचत खाते तसेच सर्व केंद्रीय योजनांची माहिती नागरिकांपर्यत पोहचावी. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या खाते आधारकार्डशी संलग्न करावेत. ग्रामीण भागात मेळावे घेण्यात यावेत. अक्कलकुवा व धडगावमध्ये बँकेने शाखा सुरु कराव्यात.नाबार्डच्या माध्यमातून मोबाईल एटीएम बँक सुरु करावीत. विविध योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यावर बँकेने कोणत्याही प्रकारची कपात करु नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  

            प्रारंभी डॉ.कराड यांनी वाशिम, धाराशिव (उस्मानाबाद), गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाशी नंदुरबार येथून दूरभाष्य प्रणालीद्वारे आकांक्षित जिल्ह्याचा आढावा घेतला.