नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्रात २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ पर्वणी अर्थात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी १२७ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात प्रकाशा हे तापी, गोमाई आणि पुलिंदा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले महाराष्ट्रातील प्राचीन तीर्थक्षेत्र असून “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केदारेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर, पुष्पदंतेश्वर आणि मनसापुरी देवीची मंदिरे तसेच सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवकालीन ऐतिहासिक वारसा या क्षेत्राचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतात. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ पर्वणीत मागील वेळी सुमारे दहा लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती. यंदा २० ते २५ लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर घाट, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, नदी संवर्धन, वाहनतळ, निवास व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षा, प्रकाश व्यवस्था आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी तातडीने करण्याची आवश्यकता निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. याशिवाय त्रिवेणी संगमाचा विकास, प्राचीन मंदिरांचे संवर्धन, नद्यांचे सुशोभीकरण आणि वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी “प्रकाशा कॉरिडॉर” विकसित करण्याचाही प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ पर्वणीसाठी आवश्यक विकासकामांचा सविस्तर आराखडा तयार करून १२७ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली असून, हा निधी मंजूर झाल्यास भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासोबतच प्रकाशा तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



