नंदुरबार 29 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेसाठी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयामार्फत अर्जदारास विनामुल्य ऑनलाईन अर्ज व प्राथमिक स्वरूपात एक पानी संक्षिप्त प्रकल्प अहवाल तयार करुन देण्यात येणार आहे, कर्ज मंजुरीनंतर मात्र अर्जदारास सनदी लेखापाल यांच्यामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल स्वखर्चाने तयार करुन बँकेस सादर करावा लागेल.  या योजनेत उत्पादन उद्योग, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, वाहतुक व त्यावर आधारीत व्यवसाय, फिरते खाद्यान्न विक्री केंद्र यासारखे व्यवसाय करता येतील.

या योजनेसाठी वैयक्तिक मालकी, भागीदारी, मान्यताप्राप्त बचत गट हे पात्र राहतील. रु. 20 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी 7 वी पास व रुपये 50 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी 10 पास अशी शैक्षणिक पात्रता राहील.  उत्पादन उद्योगासाठी रुपये 50 लाख व सेवा उद्योगासाठी रुपये 20 लाख कर्जमर्यादा राहील.  या योजनेत प्रकल्प उभारणीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. सबसिडी शहरी भागासाठी ती 15 टक्के, ग्रामीण भागासाठी 25 टक्के असेल. बॅंक कर्ज शहरी भागासाठी 75 टक्के व ग्रामीण भागासाठी 65 टक्के राहील.

अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, ईतर मागासवर्ग, विमुक्त व भटक्या जमाती व अल्पसंख्याक या प्रवर्गासाठी 5 टक्के स्वगुंतवणूक, यासाठी सबसिडी 25 टक्के शहरी भागासाठी व ग्रामीण भागासाठी 35 टक्के असेल. बँक कर्ज शहरी भागासाठी 70 टक्के व ग्रामीण भागासाठी 60 टक्के राहील.

अधिक माहितीसाठी विजय चाटी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय गाळा क्र.222, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210053,  ई -मेल पत्ता [email protected] येथे संपर्क साधावा.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकान्वये श्री. चाटी यांनी केले आहे.