नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 31 मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते 15 एप्रिल 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत  पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थारपन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने,  शॉपींग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील. करमणुक उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रिडा संकुले , मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेंम्ब्ली हॉल बंद राहतील.  सर्व  हॉटेल/ रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम बियरबार व इतर सर्व प्रकारच्या आस्थापना  बंद राहतील.  

सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम  बंद राहतील. धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील, तथापि  धर्मगुरु, पुजारी यांना नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम करता येतील.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून औषधाची दुकाने, रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील.  भाजीमंडई सकाळी 6 ते 11 या वेळेत सुरू राहील, मात्र एका आड एक ओटे राहतील. भाजीपाला आणि किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेला प्राधान्य देण्यात यावे. दुध वितरकांना सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत दुध वितरणास परवानगी असेल. दुध वितरकांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे.

वृत्तपत्र कार्यालये आणि वृत्तपत्र छपाई व वितरणास अनुमती असेल.  किराणा आस्थापना सकाळी 6 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानात आढळल्यास दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले जाईल. दुकानाच्या समोरील बाजूस ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असा फलक लावावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी खुणा कराव्यात.  सर्व प्रकारची माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

गॅस वितरण पूर्णवेळ सुरू राहील. पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी सुरू राहतील. यासाठी आवश्यक पुरावा संबंधिताने वितरकास दाखविणे आवश्यक आहे.  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी संबंधित परीक्षा केंद्र, नियुक्त अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा  यांना परीक्षा कामकाजासाठी मुभा राहील. परिक्षार्थींनादेखील मुभा राहील, तथापि त्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्तींना अनुमती असणार नाही. सर्व शासकीय कार्यालये, बँका शासकीय वेळेत सुरु राहतील. पोलीस, होमगार्ड, जिल्हा सुचना केंद्र, महावितरण,  सशस्त्र दले, अग्निशमन दल, शासकीय धान्य गोदाम, कारागृहे, म्युन्सिपल सेवा कोणत्याही बंधनाशिवाय सुरू राहीतल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.याशिवाय शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.

शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व कोचिंग संस्था, वसतिगृहे, प्रशिक्षण संस्था 27 मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. ऑनलाईन किंवा दूरस्थ शिक्षणास अनुमती असेल, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिले आहेत.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी सुचनांचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.