नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले 676 मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून देखील नागरिकांना जिल्ह्यात आणण्यात आले आहे.

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या सुचनेनुसार दोन्ही प्रकल्प कार्यालयांनी मजूरांना परत आणण्यासाठी नियोजन केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाशी आणि जिल्ह्यातील समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क  साधण्यात आला. तिथल्या मजूरांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी शैलेश पाटील, अमोल मटकर, राहूल इधे आणि किरण मोरे या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

द्वारका येथील 220, पोरबंदर 55, वापी 103, आणंद 37, जामनगर 59, बडोदा 32, गांधीनगर 43, भरूच 102, दमण 25 अशा प्रकारे एकूण 676 मजूरांना परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सर्व मजूरांच्या जिल्हानिहाय याद्या तयार करून वाहनाची सोय केली.

 आदिवासी विभागामार्फत न्यूक्लिअस बजेटच्या माध्यमातून वाहन खर्चाची सुविधा करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे यातील बरेचसे मजूर गावाकडे परतले असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.  सीमेवर सर्व मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच या मजूरांच्या भोजनाचीदेखील सोय करण्यात आली.  मजूरांचा रोजगार गेल्याने त्यांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे देखील प्रयत्न  प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत.

वसुमना पंत, प्रकल्प अधिकारी- सर्व मजूर विविध ठिकाणी विखुरलेले असल्याने त्यांना एका ठिकाणी आणून परत आणणे हे मोठे आव्हान होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयाने ते शक्य झाले. पुढच्या टप्प्यात या मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या गावात परतल्याचा त्यांना आनंद असल्याने संपूर्ण टीमसाठी ही समाधानाची बाब आहे. अविश्यांत पांडा, प्रकल्प अधिकारी- गुजरातमधील 9 जिल्ह्यातून आणि राज्यातील विविध भागातून आदिवासी नागरिकांना त्यांच्या गावात आणण्यासाठी एकाचवेळी विविध पातळ्यांवर नियोजन सुरू होते. त्यांची माहिती मिळविणे हेदेखील आव्हान होते. नंदुरबार आणि गुजरातच्या प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाल्याने हे मजूर गावाकडे परतू शकले.