नंदुरबार-( प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या लढाईत जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत असलेले स्वच्छाग्रही सहभागी झाले असून, स्वच्छाग्रहीमार्फत ग्रामीण भागात स्वच्छ हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक च्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येऊन ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे

नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावात औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच ग्राम स्तरावर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छाग्रही यांच्यामार्फत कोरोना या संसर्ग आजारापासून बचाव होण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे, हात धुणे, तोंडाला नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीवजागृती करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छतेविषयक बाबींवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व स्वच्छतेविषयक ग्रामपंचायत स्तरावर जाणीव जागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंसेवक म्हणून एक किंवा दोन असे एकूण ११४८ स्वच्छाग्रही नियुक्त करण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहीची ग्रामस्तरावरील स्वच्छते विषयक कामांसाठी शासनाला नेहमीच मदत होते.

कोरोना विरुद्धच्या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणेबाबत राज्यस्तरावरून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावात काम करणेबाबत प्रोत्साहित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींनी कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थांच्या गृहभेटी च्या माध्यमातून सामाजिक अंतर राखणे, खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्क वापरणे, हात धुणे याविषयी वैयक्तिकरीत्या किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या सोबत घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती करीत आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी स्वच्छाग्रही मार्फत ग्रामस्थांना हात धुण्याची पद्धत, हात कसे धुवावेत याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविली जात आहेत. तसेच ग्रामपंचायतीमार्फत वाटप करण्यात येत असलेले मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्याच्या कामातही स्वच्छाग्रही पुढाकार घेत आहेत. ग्रामस्थांमध्ये शौचालय वापर, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता याविषयी माहिती देऊन ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती केली जात आहे.