नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील 25 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या गावात विशेष मोहिम राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील,  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा साथरोग  अधिकारी डॉ.एन.एल.बावा आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, शहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. त्यासाठी नागरीक, नगरसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य करावे.  शहरी भागात जून अखेरपर्यंत 75 टक्क्यापेक्षा अधिक लसीकरण होईल यादृष्टीने नियोजन करावे.  ग्रामीण भागात 90 टक्क्यापेक्षा अधिक लसीकरण झालेल्या गावात उर्वरीत नागरिकांचे लसीकरणासाठी समुपदेशन करण्यात यावे.

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासोबत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढवावी. दररोज किमान एक हजार आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. प्रत्येक महिन्यात एकदा शहरी भागातील व्यावसायिकांच्या रॅपिड अँटीजन चाचण्या करण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात यावे.

बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसलिदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी,  वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.