नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेमुळे कोरोना संकटाच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अल्पदरात भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील 13 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन लाखापेक्षा अधिक थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त शहरात येत असतात. अशावेळी त्यांना भोजनासाठी अधिक खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. 2 चपात्या, 1 भाजी आणि वरण-भात समाविष्ट असलेल्या थाळीचा दर शहरी भागासाठी 50 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 35 रुपये निश्चित करण्यात आला.

सुरूवातीस 10 रुपये प्रति थाळी याप्रमाणे भोजन वितरीत करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. शिवभोजन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शिवभोजन थाळीचे वितरण करणे बंधनकारक आहे. सुरूवातीला जिल्हा मुख्यालयी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे.

कोरोना संकटाच्या काळात उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी एप्रिल महिन्यापासून शासनाने थाळीची किंमत 5 रुपयापर्यंत कमी केली. थाळीची उर्वरीत रक्कम शासनातर्फे अनुदान देण्यात येत असल्याने  अत्यंत कमी दरात नागरिकांना शिवभोजन केंद्रातून भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात 10 रुपये दराने 16 हजार 497 आणि 5 रुपये दराने 3 लाख 41 हजार थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

एका थाळीमागे शासनातर्फे 40 रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील 13  केंद्राद्वारे दररोज 1500 थाळ्यांचे वितरण करता येते. शासनातर्फे आतापर्यंत 1 कोटी 8 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.  अत्यंत कमी दरात भोजनाची सुविधा झाल्याने नागरिकही या सुविधेचा लाभ घेताना समाधान व्यक्त करीत आहेत. विशेषत: कोरोना काळात ही योजना अधिक उपयुक्त ठरली आहे.

राज्यात एकूण 907 शिवभोजन केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत 2 कोटी 53 लक्षपेक्षा अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे मार्चपर्यंत प्रतिमाह 5 ते सहा लाख असणारी थाळ्यांची संख्या कोरोना कालावधीत प्रतिमाह 30 लाखापर्यंत पोहोचली. कोरोना काळात 5 रुपये दराने थाळी मिळत असल्याने गरजूंना त्याचा लाभ झाला आहे.