नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग पिक विमासाठी शेतकऱ्यांना 1.50 टक्के प्रमाणे विमा हप्ता भरावा लागणार असून गहूसाठी 562.50 प्रती हेक्टर, ज्वारी 375 प्रती हेक्टर, हरभरा 525 प्रती हेक्टर व उन्हाळी भुईमूग 600 प्रती हेक्टर असून गहुसाठी व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर तर उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च पर्यंत पिकविम्याची रक्कम भरावयाची आहे.

रब्बी हंगामासाठी नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग, स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गीक, आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, दुष्काळ यांना संरक्षण देय आहे.

तसेच काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचीत पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे.

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.मुंबई या कंपनीची निवड केली असून योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गीक आपत्तीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबत विमा कंपनी, संबंधीत बँक, कृषि, महसूल  विभाग किंवा टोल फ्री क्रमांक 18001024088 वर संपर्क साधावा.