नंदुरबार (जिमाका वृत्त)  नंदुरबार तालुक्यातील मौजे लोय येथे महसुल सप्ताहाच्या औचित्याने विविध दाखले, ओळखपत्र व प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

हे होते उपस्थित

कार्यक्रमासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (महसूल तथा सामान्य प्रशासन)  रमेश काळे, उपआयुक्त (पुनर्वसन व भुसुधार) विठ्ठल सोनवणे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा नंदूरबारचे उपविभागीय अधिकारी मंदार पत्की तहसीलदार नितीन गर्ने लोयच्या सरपंच श्रीमती सरीताताई वळवी व शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. माळी, मौजे लोय व परीसरातील नागरीक मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

479 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ

यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. गावित यांचे हस्ते खाते फोड आदेश 3, बँक बोजा कमी करणे 16, वाटणी आदेश 3, वारस लावणे 1, हक्कसोड करणे 1, सातबारा वाटप 13, गाव नमुना घराचा उतारा नं-854, द्रारिद्र्य रेषेचे कार्ड 21, जन्म दाखले 10, संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थी प्रमाणपत्र 29, दुय्यम शिधापत्रिका 96, जातीचा दाखला 29, मतदार ओळखपत्र 66, उत्पन्नाचे दाखले 103, कृषी विभागाच्या निविष्ठा बॅग 10 व फळ बाग योजनेचे आदेश 24 असे एकुण 479 लाभार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्र, रेशनकार्ड व मतदार ओळखपत्र यांचे वाटप करण्यांत आले. 

कोण काय म्हणाले…

कार्यक्रमात डॉ. सुप्रिया गावित, यांनी सर्व नागरीकांना संबोधित करुन त्यांच्या समस्या जाणुन घेत त्यांना मार्गदर्शन करुन त्यांचेशी संवाद साधला. शासनाच्या विविध योजनेची महसुल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती मंदार पत्की यांनी तर नितीन गर्ने यांनी तहसिल कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध दाखले व योजनेची माहिती यावेळी दिली. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना करताना नायब तहसिलदार रिनेश गावित यांनी दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस महसुल दिन हा यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महसुल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यांत आल्याचे सांगितले. 

यांनी घेतले परिश्रम

सदर कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार भिमराव बोरसे, नायब तहसिलदार (पुरवठा) रमेश वळवी, मंडळ अधिकारी (धानोरा) प्रकाश पाटील श्रीमती उषा राजपुत धानोरा मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.

गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

महाराष्ट्र शासनाच्या एक हात मदतीचा उपक्रमात मोठ्या प्रमाणावर विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना, नागरीकांना मध्यवर्ती ठिकाणी व स्वत: स्वतः शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून उपलब्ध करुन दिल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.