नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2021-22 मध्ये अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनीकीट यासाठी शेतकऱ्यांच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत असून 20 मे 2021 पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता  येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत  कडधान्य बियाणसाठी 10 वर्षाआतील वाणास रु. 50 प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 25 प्रती किलो.  संकरीत बाजारी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु. 100 प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु.30 प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 15 प्रती किलो,  सोयाबीन बियाण्यासाठी 10 ते 15 वर्षाचे वाणास रु. 12 प्रती किलो याप्रमाणे   एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे.  प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भूसुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. 2 हजार ते 4 हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.   यासाठी कृषी विद्यापिठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.

सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनिकीट तूर कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021 मध्ये तूर पिकाचे 4 किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल.  तूर 412 रुपये प्रती चार किलो मिनिकीट, प्रमाणे अनुदान देण्यात येणार असून बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी लागणार आहे.  यासाठी शेतकऱ्यांनी निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.