नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात 25 मे ते 5 जून 2022 या कालावधीत हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी सामुहिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक नागरिकाला डी.ई.सी व अलबेंन्डाझॉलची गोळी देवून मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांनी जिल्हा समन्वय समितीची बैठकीत दिल्या.

हत्तीरोग प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत आयोजित मोहिमेनिमित्त जिल्हा समन्वय समितीची बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.एल.बावा, जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील, मुख्याधिकारी स्वप्निल मुघलवाडकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ.शशीकांत  वसावे, उप शिक्षणाधिकारी चंद्रकांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा वळवी, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी के.बी.बागुल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री म्हणाल्या की, नवापूर तालुक्यात हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत शहरी व ग्रामीण भागात 25 मे ते 5 जून 2022 या कालावधीत हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी एकदिवशीय सामुदायिक औषधोपचार  मोहिम राबविण्यात येणार आहे. यामोहिमेमध्ये 2 वर्षांखालील मुले, गर्भवती स्त्रिया व गंभीर आजारी रुग्ण वगळता नवापूर तालुक्यातील 2 लाख 70 हजार 201 नागरिकांना आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्करमार्फत घरोघरी, हॉस्पिटल, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शासकीय, खाजगी कार्यालये, कारखाने, बांधकामाची ठिकाणे, बाजाराच्या ठिकाणी जावून डी.ई.सी व अलबेंन्डाझॉलची गोळी खाऊ घालण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1 हजार 102 मनुष्यबळ तसेच पर्यवेक्षणासाठी 69 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. ही मोहिम राबविण्यासाठी 6 लाख 78 हजार 950 डि.ई.सी गोळ्या तर 2 लाख 70 हजार 201 अलबेंन्डाझॉलचा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी आरोग्य विभागामार्फत व्यापक जनजागृतीही करण्यात येत आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती. पाटील म्हणाल्या की, हत्तीरोग हा बुचेरेरीया बॅनक्रॉफ्टी या परोपजीवी जंतूमळे होणारा आजार असून या आजाराचा प्रसार क्युलेक्स प्रकारच्या डासांमुळे होतो. दुषित व्यक्तिंच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतू या डासांमार्फत निरोगी व्यक्तिंच्या शरीरात प्रवेश करतात. जोखीमग्रस्त भागातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला हत्तीरोगाचा धोका असू शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना एकाचवेळी डी.ई.सी व अलबेंन्डाझॉल गोळ्या खाऊ घातल्यास दुषित आणि वाहक लोकांना हत्तीरोग होण्याचा धोका टळतो. जिल्ह्यात एकूण 26 हत्तीरोगाचे रुग्ण असून त्यात नंदुरबारमध्ये 3, शहादा 2, तळोदा 4 अंडवृध्दी रुग्ण-2, नवापूर 10 अंडवृध्दी रुग्ण-2, धडगांव 3 असे रूग्ण आहेत.

ह्या गोळया शासनामार्फत विनामूल्य देण्यात येतात. मनुष्य आणि डास यांच्यातील हत्तीरोग प्रसाराचे चक्र खंडीत करण्यासाठी डी.ई.सी गोळयांचा उपचार केला जातो. या औषधांचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत त्यामुळे पात्र वयोगटातील प्रत्येक नागरिकांनी गोळी घ्यावी, तसेच नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.

*बुचेरेरिया बॅन क्रॉफ्टी  व ब्रूग्रीया मलायी नावाच्या परजीव जंतूमुळे हत्तीरोग हा आजार होतो.

*हे रोग जंतू मनुष्याच्या लसीकासंस्थेत राहतात.

*हत्तीरोगाचा जंतू मनुष्याच्या शरीरामध्ये 4 ते 6 वर्षांपर्यत राहतो. या कालावधीत तो अतिसुक्ष्म अशा पिलांना जन्म देतो. त्याना मायक्रोफायलेरिया असे म्हणतात.

*सर्व वयोगटामध्ये हा आजार होऊ शकतो.

*लक्षणे- जंतू शिरकावाची अवस्था जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांची वाढ व विकास सुरु होतो. लसीकाग्रंथी सुजतात. वेदना होतात व ताप येतो.

*लक्षण विरहित अवस्था -रक्ताच्या रात्रकालीन तपासणीत रोगजंतूच्या सुक्ष्म अळया दिसतात मात्र रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्हे दिसत नाही.

*तीव्र लक्षण अवस्था- या अवस्थेमध्ये ताप, लसीकाग्रंथी दाह, लसीकाग्रंथीस सूज तसेच पुरुषांमध्ये वृषणदाह इत्यादी लक्षणे दिसून येतात.

*दीर्घकालीन संसर्ग अवस्था- हात पाय व बाह्य जननेद्रिंयावर सूजन, हायड्रोसिल इत्यादी लक्षणे आढळतात.

*उपचार केवळ डी.ई.सी (हेट्रॉझान ) व लबेंन्डाझॉल हेच औषध हत्तीरोग संसर्ग विरोधात परिणामकारक आणि सुरक्षित आहे. यामुळे मायक्रोफायलेरिया तर मरतातच पण बहुतांश प्रौढ जंतू देखील मरतात.