नंदुरबार (जिमाका वृत्त) गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची टक्केवारी कमी असून टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास सर्वेाच्च प्राधान्य देण्यात यावे, तसेच टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावनकुमार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे,सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तसेच सर्व तालक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, सर्वसाधारणपणे नंदुरबार जिल्ह्यात जून ते जुलै या  कालावधीत गतवर्षी ८५.४ टक्के पाऊस झाला होता, चालू वर्षी तो ७६.९ इतका झाला आहे. तालुकानिहाय नंदुरबार (५० टक्के), नवापूर (७५.७ टक्के ),शहादा (६०.३ टक्के), तळोदा (११०.३ टक्के), अक्राणी (१०९.२ टक्के ),अक्कलकुवा (९८.६ टक्के ) इतका पाऊस झाला असून येणाऱ्या काळात काही तालुके व गावांमध्ये पाऊस न पडल्यास टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे रोजगार हमीतून कामे, मुबलक चारा, व प्रत्येक शेतकरी, वनपट्टेधारक हा विमाधारक कसा होईल यासाठीचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे.

ते पुढे म्हणाले, तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्य व कापूस उस यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे व खत दुकानदार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडचण करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. प्रसंगी परवाना रद्द करण्यात यावा. जुन महिन्यात वादळी वारा व अवकाळी पावसामुळे ज्या कोरवाहू,बागायती व बहुवार्षिक पिकांचे, घरांचे नुकसान झाले आहे, त्या ८८४ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत शासकीय मदत मिळेल यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. पिकविमाची मुदत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. वनपट्टेधारकांना ऑफलाईन विमा काढण्यास अनुमती देण्यात आली असून त्याबातही वनपट्टेधारकांना जागृत करावे, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

 जिल्ह्यात १५ ऑगस्ट पर्यंत एकही व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात १०० टक्के घरकुलांचे स्वप्न साकार करण्याचा मानसही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केला.

यावेळी झालेल्या चर्चेत अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावनकुमार अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे,सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तसेच सर्व तालक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांनी सहभाग घेतला.

लक्षणीय

✅ वनपट्टे धारकांना देणार ऑफलाईन पिकविमा

✅ टंचाईच्या परिस्थितीत पेयजलास सर्वोच्च प्राधान्य

✅ एकही शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार नाही यांचे नियोजन करणार

✅ रोहयो ची कामे, मुबलक चारा आणि 90 टक्के पिकविमा या त्रिसुत्रीवर टंचाईचे नियोजन

✅ 15 ऑगस्ट पर्यंत मागेल त्याला घरे देणार

✅ वादळी वारा,अवकाळी पावसाने जुन महिन्यात झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देणार