नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

            भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते.  पालकमंत्री म्हणाले, तीन एकलव्य निवासी शाळांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील राणीपूर येथे आश्रमशाळा इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.  जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात येत आहे. वर्ग खोल्यांची दुरुस्ती आणि नव्या वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. येत्या काळात प्रत्येक शासकीय शाळेला स्वत:ची इमारत असावी असे प्रयत्न करण्यात येत आहेत.

दुर्गम भागातील आश्रमशाळांच्या कामकाजावर टेक्नॉलॉजी निरीक्षण ॲपद्वारे प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी सोईचे व्हावे यासाठी कुटुंबाची आर्थिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. आदिवासी युवकांमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आवश्यक चिकाटी आणि क्षमता असून त्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करून ते म्हणाले, कोरोना काळात जिल्ह्यात उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने चांगले प्रयत्न केले आहेत. कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका अद्यापही असल्याने नागरिकांनी शारिरीक अंतर, मास्क घालणे आणि स्वच्छ हात धुणे या त्रिसुत्रीचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली, महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गतही  चांगले काम झाले आहे. दुर्गम भागासाठी मोबाईल एटीएम सुरू करण्यात येत आहे. कुपोषणाची समस्या दूर करताना रोजगार निर्मितीलाही चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भगर प्रक्रीया उद्योगाला प्रोत्साहन देणार असून केंद्र सरकारने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड केली आहे.  या योजनेत भगर व त्यावर आधारीत उत्पादनाचा समावेश असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.