नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात 29 मे 2021 रोजी वादळीवारा, वीजा व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असून या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा.  नागरिकांनी खबरदारी घेवून कुठल्याही प्रकारची आपत्ती घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे.   मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे  आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा.  घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये.

घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तु त्वरीत बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दूर रहावे. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नये. शॉवरखाली अंघोळ करु नये. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असल्यास उघड्या दारातून अथवा खिडकीतून विज पडतांना पाहू नका.  विजेपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.