नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनातून  होणारे सोयाबीन बियाणे  दोन वर्षापर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होवू शकतो. शास्त्रीयदृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके योजनांतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाण्याची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाण्याची निवड करावी.

सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्यांची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणूकीसाठी प्लॅस्टीक पोत्यांचा वापर करु नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाण्याची आदळआपट होणार नाही याची काळजी घ्यावी.

प्रती हेक्टरी बियाणे दर 75  किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावेत. सोयाबीनची पेरणी 75 ते 100 मि.मि.पाऊस झाल्यानंतरच करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.

 रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची  प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी पुढील हंगामात करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी  तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.