नंदुरबार (प्रतिनिधी)- गेल्या 15 वर्षापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन शासकीय सेवेत सामवुन घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.


सद्या कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एनएचएम कर्मचार्‍यांनी रुग्ण सेवेत झोकुन दिले आहे. मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांबद्दल शासनाची भुमिका उदासिन आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाचा संकटात माघार न घेता एनएचएम कर्मचार्‍यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन अखंडपणे रुग्णसेवा सुरु ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णावर उपचार करीत असतांना मास्क, ग्लोज, सॅनिटाईझर व आवश्यक ती सुरक्षेतची साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. परंतु असे असतांनाही त्यासाठी या कर्मचार्‍यांना काळ्याफिती लावुन आंदोलन करावे लागत आहे. त्यावरही या आरोग्य कर्मचार्‍यांच्या मागण्याची दखल घेतली जात नाही. या कर्मचार्‍यांचा सेवागाळ 15 वर्षापासुन अधिक झाला आहे. तरी देखील शासनाने त्यांचे शासकीय सेवेत समायोजन केलेले नाही. त्यांना अद्याप अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. तुलनेने नव्याने झालेल्या कंत्राटी भरतीतील कर्मचार्‍यांनाही त्यांच्या पेक्षा अधिक मानधन देण्यात येते. परंतु याच कोरोना योध्दांची सरकारकडुन दखल घेतली जात नाही. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे काल 11 जुन पासुन बेमुदत कामबंद राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीने घेतला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, आ.शिरीष नाईक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी श्रीमती एल.जी.माळी (नंदुरबार), श्रीमती चंद्रकला पावरा (तळोदा), श्रीमती सविता गावित (नवापुर), श्रीमती शकुंतला ब्राम्हणे (धडगांव), श्रीमती पुष्पा बागुल (शहादा), श्रीमती सुनंदा वळवी (अक्कलकुवा), आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते उपस्थित होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवदेन देण्यात आले.