नंदुरबार (प्रतिनिधी) – राज्य शासकीय निमशासकिय कर्मचारी संघटना समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी  आंदोलनात शिक्षक भारती संघटनेने सहभाग नोंदवला. या आंदोलनात शिक्षक भारती संघटनेने राज्यातील सर्व  शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.


त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी जि, प, नंदुरबार यांनाही शिक्षक भारती कडून निवेदन देण्यात आले, यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील म्हणाले की, देशात कोरोनाचे संकट आहे. राज्याची स्थितीची आम्हाला जाण आहे. विनाअनुदानित शाळांचा प्रश्न कोरोनापेक्षाही भयानक आहे. अनेक विनाअनुदानित शिक्षक पार्ट टाईम काहीतरी काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले, त्यांच्या हातातलं कामही शासनाने हिरावून घेतले आहे. अशा परिस्थितीत विनाअनुदानित शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे. मागच्या सरकारने आम्हाला छळले होते, आघाडी सरकार आल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांना आपलं सरकार आले, आपले काम आता निश्चित होईल, असे वाटले. मात्र, तसे होताना दिसत नाही. या सरकारने भ्रमनिरास न करता तात्काळ १००% अनुदान दिले पाहिजे, कोरोनाच्या संकटात आमच्या मागण्याही रास्त आहेत, आमच्या मागण्यांचा योग्य विचार या सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्यांचा समावेश आहे. १)  कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाइलऐवजी टेलिव्हिजनचा वापर सुरु करा. २)  ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करा. ३)  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्या. (टॅबलेट, ऍन्ड्रॉइड फोन), ४) विनाअनुदानित शाळांना विनाअट १००% अनुदान द्या, ५)  कोविड ड्युटीवर मरण पावलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्या, ६)  कोविड ड्युटीवर कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्या. ७)  कोविड ड्युटी करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतरांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करा, ८)  कोविड ड्युटी केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद घ्या. ९)  कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांना प्रोत्साहन भत्ता द्या व विशेष वेतनवाढ लागू करा. १०) शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्या. ११) शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सँनिटायझेशन करा. शाळांना थर्मल स्कॅनिंग मशीन, सॅनिटायझर, मास्क हॅण्डग्लोज इत्यादी  सर्व साहित्य उपलब्ध करून द्या.१२)  कोरोना काळात विद्यार्थ्यांना वर्कबुक व अॅक्टिव्हिटी बुक द्या. १३) कोरोनामुळे स्थलांतरित गरीब, दलित, मागासवर्गीय व भटक्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील  शाळेत विनाअट  प्रवेश द्या. १४) कोरोना काळात अनुदान, पगार, महागाई भत्ते इत्यादींमध्ये कपात करू नका. १५) मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतरांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नका, आशा मागण्यांचा त्यात समावेश आहे.


फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक भारती विनाअनुदानित संघर्ष समितीचे राज्यकार्याध्यक्ष व शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल अशोकराव पाटील, आशिष दातीर, महेश नांद्रे, राजेश जाधव, पुष्कर सूर्यवंशी, संजय पाटील, गोरख पाटील, सुर्यवंशी सर, राहुल मोरे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.