नंदुरबार- मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयक जागृती व्हावी या उद्देशाने जी.टी.पाटील महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” यानिमित्ताने काव्यवाचन उपक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांनी अध्यक्षीय भाषणातून पाणी, पर्यावरण या विषयावर कविता सादर करून, विद्यार्थ्यांना “पाणी अडवणे व जिरवण्याची आवश्यकता असल्याचा संदेश दिला. तसेच या काव्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत काव्यवाचन कार्यक्रमातून प्रतिभावान कलावंतांना संधी मिळून, ते स्वतःला घडवत असतात, म्हणून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व्हावेत अशा प्रकारचा विचार मांडला.
काव्यवाचन कार्यक्रमात समाधान वाघ, कमलेश महाले, दीप पाटील, दर्शन भावसार, गौरव पुंडे, मंदाराणी सूर्यवंशी, रोशनी कोकणी, कासिम पठाण कल्याणी कळकटे रोहिणी कोकणी, शुभम सोनार, प्रतिक कदम या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन सादर करत त्यांनी प्रेमविषयक, सामाजिक, राष्ट्रप्रेमविषयक या विषयीच्या भावना, जाणिवा यांचा उत्स्फूर्तपणे आविष्कार केला. त्यांच्या काव्याच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.माधव कदम यांनी हसतखेळत, विनोदाची उधळण करत केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश अर्जुन भामरे, डॉ. विजया पाटील, डॉ. सुलतान पवार, डॉ. मनोज शेवाळे, प्रा.एन.आर.कोळपकर, प्रा. शुभांगी देवकर, प्रा.महेंद्र गावित, प्रा. जितेंद्र पाटील आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.