नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई,  खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य  पदार्थ (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडे)  संबंधित सर्व दुकाने, शेतीशी संबंधित उत्पादने, पशुखाद्य आणि मान्सूनपुर्व तयारी संदर्भातील दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू राहतील. कोणत्याही परिस्थितीत दुकाने किंवा आस्थापनांना सकाळी 11 वाजेनंतर उघडून टेकअवे किंवा पार्सल पद्धतीने विक्री करता येणार नाही, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र शासनाकडील  आदेशानुसार 14 एप्रिल  2021 रोजी जारी केलेला आदेश कायम ठेवण्यात येवून केवळ वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवारी पुर्णत: संचारबंदी लागू असून त्यात वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने, पाणी, विद्युत, गॅस वितरक, दुध विक्रेता आणि वृत्तपत्र छपाई व वितरणाला मुभा राहील.

  कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.