नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गापुजा, दसरा हे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

            सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका,नगरपालिका,स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबत धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

  या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी.

 या वर्षी शक्यतो पारंपारीक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.  विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.

उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम,शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.  आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावी.

 देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.  देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरिक अंतराचे (फिजिकल डिस्टंसिंग) तसेच स्वच्छेतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

 देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

नगरपालिका,विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.  तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी, तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रेक्षपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

वरील कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये आणि कोविड-19 या संसर्गजन्य़ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यावर्षीचा नवरात्रौत्सव शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.