नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक पिकाची उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) विकास पाटील यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी भात,ज्‍वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग,  सुर्यफुल,  मुग व उडीद या 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे.तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1 हजार हेक्टर हून अधिक आहे अशा सर्व पिकांकरिता पीकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क असेल.             एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. यापूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते आता ते काढून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षात ज्‍या शेतकऱ्यांची तालुका पातळीवर प्रथम  दोन क्रमांक आलेले शेतकरी जिल्‍हा पातळीवर पिकस्‍पर्धेमध्‍ये भाग घेण्‍यास पात्र असतील. तालुका व जिल्‍हा पातळीवरील पिकस्‍पर्धा स्‍वतंत्र होणार आहे. खरीप  हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख  मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै 2022 व इतर पिकामध्‍ये भात, ज्‍वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर,  सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्‍ट 2022 आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.