नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील दुकानदार, व्यावसायिकांनी कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे आणि दुकानाबाहेर ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ चा फलक लावावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा‍ जिल्ह्याचे  पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील दुकानदारांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले,  दुकानात सॅनिटायझरची सुविधा ठेवण्यात यावी आणि शारीरिक अंतराचे पालन करण्यात यावे. भाजीपाला आणि फळविक्रेत्यांनी आपल्या हातगाड्या किंवा स्टॉल निश्चित करून दिलेल्या अंतरावर लावावे. दुकानदारांच्या सुचनांबाबत सकारात्मक विचार  करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

दुकानदारांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून संकटाच्यावेळी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

यावेळी दुकानदारांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. सर्व प्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणात प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.