नंदुरबार – कोरोना (Covid-19) या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात नव्हे तर जगभरात मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत. “आमचाही खारीचा वाटा” म्हणत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी अश्या तब्बल २० जणांनी रक्तदान करून देशसेवेच्या कार्याला मोलाचा हातभार लावला आहे.
सध्या जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने जगभरातील समाजसेवी वृत्तीची प्रचिती वेगवेगळ्या उपक्रमांतून समोर येत आहे. अशातच नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला साथ देत जिल्हा परिषदेच्या २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून देशसेवेच्या कार्याला हातभार लावला आहे. जिल्हा परिषद इमारतीमध्येच आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरावेळी सुरक्षित अंतराची काळजी घेत, वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्रमाने रक्तदान करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर रौदळ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री भुपेंद्र बेडसे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थिती होते.


नंदुरबार जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले असून, केंद्र शासनाच्या वर्गवारीनुसार हा जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे जनजीवन पूर्णतः बंदिस्त झाले आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले रक्तदान नक्कीच उपयुक्त ठरेल. कार्यालयात १० % कर्मचारी उपस्थितीचे शासनाचे आदेश असल्यामुळे आधीच मोजके कर्मचारी जिल्हा परिषदेच्या इमारतीत उपस्थित असतांना त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी या शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. दुसरीकडे इतर अनेक कर्मचारी रक्तदानासाठी इच्छुक असूनही घरीच असल्यामुळे त्यांना या उपक्रमात सहभागी होता आले नाही, अश्यांसाठी पुन्हा हा कार्यक्रम आयोजित करण्याचा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी दिली.