नंदुरबार  : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर करोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसोबतच जनजीवन सामान्य करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले असून ‘मिशन बिगीन अगेन’ च्या पहिल्या टप्प्यास 3 जुनपासून  सुरुवात होत आहे.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले असून त्यानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शारीरिक अंतर आणि करोना प्रतिबंधक सूचनांचे पालन न करणारी दुकाने अथवा संकुल तात्काळ बंद करण्यात येणार आहे.

 जिल्ह्यांतर्गत बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून आंतरजिल्हा बससेवेबाबत नंतर आदेश निर्गमित करण्यात येतील. आंतरराज्य बससेवादेखील बंद राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्शा सुरू राहतील, तथापि केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती राहील. चारचाकी वाहनाने देखील वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर केवळ चालकाला (एका व्यक्तीस) अनुमती असेल. सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस अनुमती असेल. शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासदेखील अनुमती असेल.

शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक व इतर वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरीअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू ठेवण्यास अनुमती असेल. शासकीय कार्यालयात 100 टक्के उपस्थिती ठेवता येईल. प्रेक्षकाशिवाय वैयक्तिक व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू ठेवण्यासही अनुमती राहील. मात्र इनडोअर उपयोगास अनुमती असणार नाही आणि  समुह किंवा गट यांना अनुमती नसेल. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.  हॉटेलमधील पार्सल सेवेलाच केवळ अनुमती असेल.

शॉपींग मॉल्स, चित्रपटगृहे, प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि ऑडीटोरीअम, असेंम्ब्ली हॉल पूर्वीप्रमाणे बंद राहतील. जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आठवडे बाजार भरण्यास बंदी  असणार आहे. धार्मिक कारणासाठी एकत्र होण्यासही बंदी असेल. सलून आणि पार्लरलादेखील अनुमती असणार नाही.

जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कोणत्याही नागरिकास आवश्यक बाब वगळता इतर कारणासाठी बाहेर फिरण्यास बंदी असेल.  ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षाखालील मुले, गंभीर आजार असलेले रुग्ण आणि गर्भवती महिलांना बाहेर फिरण्यास अनुमती राहणार नाही. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठी त्यांना बाहेर निघता येईल.  प्रतिबंधीत क्षेत्रात केवळ मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल वापरणे बंधनकारक आहे. एका ठिकाणी 5 पेक्षा अधिक नागरिक जमा होणार नाही याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापकाची  असेल. लग्नामध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी होणार नाही व करोनाविषयक सर्व नियमांचे पालन आवश्यक आहे. अंत्ययात्रेत 20 पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी असणार नाहीत व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.

सार्वजनिक थुंकणे दंडनीय अपराध मानण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखूचे सेवन करण्यावर बंदी असेल. सर्व दुकानांवर प्रत्येक व्यक्तीत 6 फुटाचे अंतर ठेवण्यात येईल व एकावेळी 5 ग्राहक नसतील. या व्यतिरिक्त शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. प्रतिबंधीत क्षेत्रात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुभा देण्यात आलेल्या आस्थापनाच केवळ सुरू राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.

 आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल.  हा आदेश 1 जून 2020 पासून अंमलात येणार असून 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत  अंमलात राहील. आदेशात नमूद प्रतिबंधाबाबत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.