नंदुरबार(प्रतिनिधी)-लोकशाहीचा प्रसार माध्यम चौथा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपली शक्ती अडचणीतील लोकांसाठी वापरावी. पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य पत्रकार संघ सर्वतोपरी मदत करेल. कोरोनाच्या काळात माध्यम क्षेत्रावरही मोठे संकट ओढावल्याने आपल्यातील कोणी पत्रकार अडचणीत असेल तर त्याची अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. तर पत्रकार संघाच्या पाठपुराव्यानंतर कोरोना काळात आरोग्य व पोलिस कर्मचार्‍यांबरोबर पत्रकारांनाही विमा संरक्षण सरकारने दिले असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.  नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांशी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शुक्रवार दि. 10 जुलै रोजी वेब संवाद करत समस्या जाणून घेतल्या. राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसंत मुंडे हे प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधत संकटाच्या काळात धैर्याने लढण्याचा आणि अडचणीतील लोकांना मदत करत आपल्या सहकार्‍यांना साथ देण्याचा विश्‍वास निर्माण करत आहेत. लोकशाहीत प्रसार माध्यम चौथा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपली क्षमता अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी वापरावी. उद्योग धंदे बंद झाल्याने विभागीय आणि जिल्हास्तरावरील दैनिकांचे प्रकाशन बंद पडल्याने पत्रकारांसह हजारो लोकांवर बेरोजगारीचे व आर्थिक संकट ओढावले आहे. अशा काळात पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी आपली क्षमता वापरुन अडचणीत असलेल्या आपल्या क्षेत्रातील सर्व घटकातील लोकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले. राज्यभरात पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी अडचणीतील सहकार्‍यांना साथ देण्याची भूमिका घेतल्याचे अनेक ठिकाणचे दाखलेही त्यांनी दिले. तर कोरोनाच्या काळात राज्य सरकारने आरोग्य व पोलिस कर्मचार्‍यांना पन्नास लाखाचे विमा कवच जाहीर केल्यानंतर राज्य मराठी पत्रकार संघाने लोकात जावून काम करणार्‍या आणि शासन व प्रशासनाला वस्तुस्थितीची जाणीव करुन देणार्‍या पत्रकारांनाही विमा कवच देण्याची मागणी लावून धरली. शासनाने पत्रकारांनाही विमा कवच दिले.

कोरोनामुळे छोट्या वृत्तपत्रांच्या अडचणीची जाणीव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करुन देण्यात आलेली आहे. अनेक वर्ष ठाकरे यांनी दैनिकाची जबाबदारी सांभाळली असल्यामुळे त्यांच्याकडून पत्रकारांना अपेक्षा असल्याने माध्यम क्षेत्रासाठी ठोस तरतूद होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तर संघटनेत जिल्हा आणि तालुका पातळीवर काम करताना नेमके कशा पध्दतीने काम करावे याबाबत उपयुक्त मार्गदर्शनही त्यांनी केले. थेट जिल्हा आणि तालुका पातळीवरील पत्रकारांना प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधून आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने संकटाच्या काळात पत्रकारांमध्ये या वेब संवादाने आत्मविश्‍वास वाढला.  यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष जगदिश सोनवणे यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा वसंत मुंडे यांनी केली. यावेळी  ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष रविंद्र गुरव, जनशक्ती चे जिल्हा प्रतिनिधी रविंद्र चौव्हाण, जय महाराष्ट्र न्यूज चे विशाल माळी, तळोदा तालुका अध्यक्ष महेंद्र लोहार, गर्जा महाराष्ट्र चे जीवन माळी, शहादा चे विनय जैन, न्यूज 11 चे अनिल राठोड, साप्ताहिक नंदुरबार टॉवर चे प्रेमचंद राजपूत, टाइम्स न्यूज चे जितेंद्र जाधव तसेच जिल्ह्यातील विविध दैनिकाचे, साप्ताहिक तसेच वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी चर्चेत सहभागी झाले होते.

  जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराला संघटनेत सामावून घेतले जाईल आणि प्रत्येक पत्रकाराच्या सुख दुःखात संघटना खंबीरपणे उभी राहील. संघटनेमध्ये कोणतेही वादविवाद होणार नाहीत, ही काळजी घेतली जाईल. भविष्यात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा विमा काढून संरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. :- जगदिश सोनवणे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नंदुरबार