नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नाताळचा सण ख्रिश्चन बांधवांनी साध्या पद्धतीने साजरा करावा आणि नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

            नाताळच्या सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चेमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारिरीक अंतर राखले जाईल यांची काळजी घेण्यात यावी.

            चर्चेमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे द्यावे.  नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवण्याच्या ठिकाणी शारिरीक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

            चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन शारिरीक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने, स्टॉल लावण्यात येऊ नयेत. 60 वर्षावरील नागरिकांनी तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्यादृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.

            सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये.

            फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावेत. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7 वाजता किंवा त्यापुर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावेत.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

नाताळ सण  शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.