नंदुरबार (प्रतिनिधी) – दिनांक 04 ऑक्टॉवर 2021 रोजी ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2021 / प्र.क्र .113 एसडी -6 मंत्रालय मुंबई दिनांक 24 सप्टेंबर , 2021 अन्वये निर्णय झालेला होता . त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे व डॉ . युनूस पठाण यांनी नियोजन करून सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या साहाय्याने शाळा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले. यात ग्रामीण भागातील 917 शाळांमधील 159509 विद्यार्थी तसेच शहरी भागातील 178 शाळांमधील 37339 विद्यार्थी शाळेत येतील यासाठी नियोजन करण्यात आले . शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेतील 160 अधिकारी व कर्मचारी यांना 617 शाळा भेटी व तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले . कोव्हीड -19 च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करुन शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज करून मास्क , सैनेटायझर देण्यात येऊन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण समारंभपूर्वक करण्यात आले . त्यानंतर त्यांना कोव्हीड -19 रोगाबाबत जागरुकतेसाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या . राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरु केलेले ‘ माझा विद्यार्थी माझी जवाबदारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी शाळास्तरावर करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री मच्छिद्र कदम व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी यांनी नियोजन करून प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी दत्तक देऊन आजपासून त्यांना नियमित शाळेत आणणे व त्यांच्या आरोग्याची दररोज तपासणी करीत राहणे यासारख्या बाबी पार पाडल्या जाणार आहेत . जिल्ह्यात शाळेच्या प्रथम दिनी ग्रामीण भागातील 917 शाळांमध्ये 159509 विद्यार्थ्यांपैकी 95705 विद्यार्थी उपस्थित होते . एकूण 6857 शिक्षकांपैकी 4319 शिक्षक उपस्थित होते . तसेच एकूण शिक्षकेतर कर्मचारी 975 पैकी 614 कर्मचारी उपस्थित होते . शहरी भागातील 178 शाळांमध्ये 37339 विद्यार्थ्यांपैकी 12321 विद्यार्थी उपस्थित होते . एकूण शिक्षक कर्मचारी 2079 पैकी 303 शिक्षक उपस्थित होते तसेच एकूण शिक्षकेतर कर्मचारी 725 पैकी 225 कर्मचारी उपस्थित होते . नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम असल्याने निवडणूक कामकाजासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांची उपस्थिती कमी आहे . माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम यांनी Google link तयार करून विद्यार्थी उपस्थितीचा आढावा सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून मोबाईल फोन मार्फत घेतला . शाळा शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा व पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी समाधान व्यक्त केले .