नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 15:   कोरोना प्रतिबंधात्मक उपायाच्या संदर्भात प्रशासनाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून यापुढील काळात जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शैखर रौंदळ, आदी उपस्थित होते.

            श्री. गमे म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात यावे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांकडून नियमाचे कटाक्षाने पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपर्कातील व्यक्तिंची त्वरीत स्वॅब चाचणी घेण्यात यावी. ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टरांकडील तापाच्या रुग्णाची माहिती घ्यावी. मास्क न घालणाऱ्या व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या व्यक्तीं विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 रुग्णासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिक्तपदाचा आढावा घेऊन कंत्राटी तत्वावर आवश्यक ती पदे त्वरीत भरण्यात यावीत. दुर्गम भागात आवश्यकतेनुसार ॲन्टीजन टेस्टचा उपयोग करावा. दररोज किमान 500 व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात यावी. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणाचे विश्लेषण करुन मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे श्री.गमे म्हणाले.

जिल्ह्याचे महसूली कामकाज समाधानकारक

कोरोना संकटाच्या परिस्थितीत जिल्ह्यातील महसूली कामकाज समाधानकारक असल्याचे श्री.गमे म्हणाले. मनरेगा अंतर्गत अधिकाधिक कामे घेण्यात यावीत. सिंचन विहीरीची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. मंजूर असलेले घरकुलाची कामे सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. पाणंद व शिवार रस्त्यांच्या कामाबाबत आवश्यक ॲप तयार करण्यात यावे. ‘विकेल ते पिकेल’ योजनेचा अधिकाधिक प्रसार करावा, असे त्यांनी सांगितले.

            यावेळी विभागीय आयुक्तांनी ई -फेरफार, महाराजस्व अभियान, आधार प्रमाणिकरण, आधार नोंदणी, पी.एम.किसान योजना, पीककर्ज वाटप, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी आदी विविध विषयाचा आढावा घेतला.

 जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी सादरीकरणाद्वारे कोरोनाविषयक केलेल्या उपाययोजनांची आणि जिल्ह्यातील महसूली कामकाजाची माहिती दिली. आतापर्यंत 13 हजार 295 व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली असून तापाच्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लँन्टची उभारणी करण्यात येणार असल्याची  माहिती त्यांनी दिली. मनरेगा अंतर्गत संकटाच्या परिस्थितीत 60 हजारपेक्षा अधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

            बैठकीत, विविध यंत्रणाचे प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्पुर्वी श्री.गमे यांच्या हस्ते चार शासकीय वाहनाचे हस्तातरण करण्यात आले.

कोविड रुग्णालयाला भेट

            विभागीय आयुक्तांनी जिल्हा रुग्णालय परिसरातील आरटीपीसीआर लॅब व कोविड हॉस्पिटलला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. त्यांनी एकलव्य कोविड केअर सेंटर येथे भेट दिली व तेथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. भविष्यात बाधितांची संख्या वाढल्यास त्यादृष्टीने आवश्यक नियोजनाबाबत त्यांनी सूचना दिल्या.