कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्याला  99 कोटी 24 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून 13 हजार 920 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेता येणार असून त्यासाठी बँकेकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 10 हजार 118 लाभार्थ्यांसाठी  65 कोटी 5 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर इतर बँकांमधील 3802 लाभार्थ्यांसाठी 34 कोटी 19 लक्ष रुपयांचा ‍निधी प्राप्त झाला आहे. कर्जमुक्तीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी  आधार प्रमाणिकरणाच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. त्यासाठी प्राप्त 24 हजार 720 कर्जखात्यांपैकी 22 हजार 281 खात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण करण्यात आले आहे.

उर्वरीत कर्जखात्यांच्या प्रमाणिकरणाची प्रक्रीया लवकरच पूर्ण करण्यात येणार असून या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आता नव्याने कर्ज घेता येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी  विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे सादर करावा, या प्रक्रीयेत समस्या  असल्यास तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ॲड.के.सी.पाडवी- महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना शासनातर्फे लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी यंत्रणेला आधारप्रमाणिकरण प्रक्रीयेला गती देण्याच्या सूचना पूर्वीच दिल्या आहेत. कर्जमुक्त झाल्याने संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेता येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने कर्जमुक्ती योजना यशस्वीपणे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने राबविल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.