N7 NEws

नंदुरबार (प्रतिनिधी) :- करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानूसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 च्या कलम 144 नुसार जिल्ह्यात सोमवार 23 मार्च 2020 मध्यरात्रीपासून 31 मार्च 2020 पर्यंत मनाई आदेश दिले आहेत.
या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व सीमा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात येतील. कोणत्याही खाजगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेशी संबंधीत वाहनांना फिरण्यास अनुमती असेल.
जिल्ह्यातील नागरीकांनी केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्यास अनुमती असेल. पोलिसांनी विचारणा केल्यावर योग्य कारण सांगावे लागेल व त्याचा पुरावा सोबत ठेवावा लागेल. अन्यथा कारवाई करण्यात येईल. अशा योग्य कारणांसाठी बाहेर पडल्यानंरही नागरिकांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास अनुमती असणार नाही.
अशा अत्यावश्यक कामासाठी जाताना टॅक्सी किंवा खाजगी वाहनात चालक आणि इतर दोन व्यक्तींना अनुमती असेल, तर रिक्शाचा उपयोग करताना चालक आणि एका व्यक्तीस अनुमती असेल. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रवाशांच्या वाहतूकीला अनुमती असेल. सामान्य कामकाजासाठी ही अनुमती असणार नाही.
जिल्ह्यात बाहेरील राज्याच्या बसेस किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वाहतूक बंद असणार आहे. बँक, विमा, एटीएम, मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, पोस्ट आणि इंटरनेट सेवा, जीवनावश्यक वस्तूंसाठी ई-कॉमर्स, खाद्य पदार्थांची घरपोच सेवा, जीवनावश्यक वस्तू, रुग्णालये, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, खाजगी सुरक्षा सेवा, करोना नियंत्रणासाठी सहकार्य करणाऱ्या आस्थापना, औषधे, दूध, बेकरी, अन्नधान्य, कृषी निविष्ठा, पशूखाद्य, पशूंचे दवाखान्यांशी संबंधित आस्थापना व वाहतूक सुरू राहील. इतर सर्व व्यावसायिक आस्थापना या कालावधीत बंद राहतील.
सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी प्रवेश बंद असेल. त्या ठिकाणी केवळ नियमित पूजाअर्चेसाठी पुजाऱ्यांना किंवा केवळ संबंधित व्यक्तीस अनुमती असेल. सर्व प्रकारचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, जत्रा, ऊरुस, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर स्पर्धा याना मनाई राहील.
शासकीय कार्यालये व इतर अनुमती दिलेल्या आस्थापनांनी सूचनेनुसार किमान कर्मचारी ठेवावेत व दोन व्यक्तिंमध्ये आवश्यक अंतर राहील याची दक्षता घ्यावी. अशा ठिकाणी हात धुण्याची व सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्यात यावी. जनतेला अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच ही कार्यालये सुरू राहतील. दुकाने, सेवा आस्थापना, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, व्यायाम शाळा, संग्रहालये बंद राहतील.
राहत्या घरी क्वॉरंटाईन केलेली व्यक्ती बाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व अशा व्यक्तीला शासकीय क्वॉरंटाईनच्या स्थळी हलविण्यात येईल. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर फिरू नये व करोना नियंत्रणात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणरी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता 1860 च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील.
दस्तनोंदणी 31 मार्चपर्यंत बंद
नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यक निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी 30 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.