नंदुरबार दि.14 : कोविड-19 चे संकट आणखी काही काळ असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांचे आरोग्य आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 50 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळ्यांवर विभाग प्रमुखांनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, कैलास कडलग, महेश सुधळकर आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, कोरोना दीर्घकाळ राहील यादृष्टीने नियोजन करावे. शासकीय रुग्णालयाची यंत्रणा अधिक परिपूर्ण करण्यावर भर द्यावा. मान्सूनपूर्व रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीची कामे करावी. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास त्या भागातील व्यवहार तातडीने बंद करावेत. ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना रोजगार नसल्याने मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यापक नियोजन करण्यात यावे. प्रत्येक गावाने योजनेअंतर्गत एक मोठे काम घ्यावे. शिक्षकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना योजनेचे महत्व पटवून द्यावे. अक्कलकुवा आणि अक्राणी भागात वन व कृषी विभागाने विशेष पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात किमान 100 कोटीपेक्षा अधिकची कामे होऊन 50 हजार मजूरांना रोजगार मिळेल असे प्रयत्न सर्व यंत्रणांनी मिळून करावे. मजूरी अदा करण्याच्या कामात उशिर करू नये, असे निर्देश त्यांनी दिले. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून धान्यवाटपात गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी. मान्सूनपर्वू रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कुठलेही नवे काम सुरू करू नये, केवळ दुरूस्तीची कामे करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गौडा म्हणाले, ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नेमलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांनी आठवड्यात दोन दिवस गावाला भेट देऊन कामाचे नियोजन करावे. गाळ काढणे, सीसीटी, वनक्षेत्रात दगडी बांध आदी कामे अधिक प्रमाणात घेण्यात यावीत. मजूरांना नियमितपणे काम उपलब्ध होईल असे नियोजन करावे. पावसाळ्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाच्या लसीच्या उपलब्धतेबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.