नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता  नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोट्या कागदी राष्ट्रध्वजाचा उपयोग करण्यात यावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज संहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा. अशी विक्री होताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 नुसार कार्यवाही करावी. सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि महामंडळांनी प्लॅस्टिक ध्वजाच्या वापरास पायबंद घालावा.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वातंत्र्य दिनाचा संपुर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न करावा. याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल हा कार्यक्रम साजरा करतांना कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.