नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाबाधितांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून आज दिवसभरात 308 बाधित उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. बुधवारी देखील 123 बाधितांना कारोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते.

जिल्ह्यात आतापर्यंत 2833 कोविड पॉझिटीव्ह आढळले असून त्यापैकी 1706 बरे झाले आहेत. 1044 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 78 बाधितांचा मृत्यू झाला आहे. स्वॅब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊन तो 60 टक्क्यापर्यंत पोहोचला असून मृत्यू दर 5.5 टक्क्यावरून 2.8 टक्क्यावर आला आहे. यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे.

कोरोना आजाराची लक्षणे असल्यास त्वरीत स्वॅब घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. स्वॅब चाचण्यांची संख्या 10 हजारावर पोहोचली आहे. त्यासाठी तालुका स्तरावर मोबाईल टीम नेमण्यात आल्या आहेत. तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रॅपीड अँन्टीजन टेस्टची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढल्याने आणि नंदुबार येथेच लॅब सुरू झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य झाले आहे.

जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय येथील कोविड रुग्णालयात तीव्र लक्षणे असलेल्या बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. याठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची सुविधा आहे. तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल नंदुरबार, शहादा, नवापूर आणि सलसाडी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यात येत आहे. नंदुरबार आणि नवापूर येथे प्रतयेकी दोन खाजगी रुग्णालयात देखील शासनाने निश्चित केलेल्या शुल्का नुसार कोविड बाधितांवर उपचाराची सुविधा आहे.

बाधित रुग्णांची संपर्क साखळी शोधून त्यांची स्वॅब चाचणीदेखील वेळेवर करण्यात येत असल्याने आजाराची प्राथमिक लक्षणे असतानाच उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे उपचारानंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. खाजगी रुग्णालयातील ताप असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांची देखील स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. दररोज तालुकानिहाय स्वॅब तपासणीचा आढावा प्रशासन स्तरावर घेण्यात येत आहे. स्वॅब तपासणी वाढवून संपर्क साखळी खंडीत करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले आहेत.

मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना नियंत्रणसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत आदी सर्व यंत्रणांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यासोबत नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. आजाराची लक्षणे आढळताच त्वरीत स्वॅब चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.